पुणे – गोवंश संवर्धन आणि पशुपालनाचे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठे महत्त्व आहे. या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि विकास होतो. यासाठी देशी वाणांचे संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच त्यांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे मत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मुख्यालयाचे उद्घाटन औंधजवळील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त हेमंत वसेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकने, गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, सनथकुमार गुप्ता, उद्धव नेरकर, दीपक भगत, आदी यावेळी उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, गोसेवा आयोगाकडे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे काम देण्यात येणार आहे. शेखर मुंदडा म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये गोसेवा करताना अनेक गोसेवकांचे प्राण गेले. अशापैकी 50 गोसेवकांना प्रत्येकी 1 लाख रुपये आयोगाकडून मदत देण्यात येणार आहे. तसेच गोसेवा करण्यासाठी आयोगाकडून गायांची खरेदी करण्यात येणार आहे.