भुईंज, दि. 2 (प्रतिनिधी) – आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करण्याच्या नावाखाली पिकांमधील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध तणनाशकांचा सर्रास वापर होत आहे. परिणामी प्राचीन काळापासून निसर्गत: मिळणाऱ्या रानभाज्या नष्ट होऊ लागल्या आहेत. पुर्वजांचा हा ठेवा जपण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनाची आवश्यकता आहे.
पावसाळ्यात प्रतिवर्षी भेटणाऱ्या पाथर, तांदळी, माठ, आंबट चुका, टाकला, चिवळी अशा असंख्य पौष्टिक आणि औषधीयुक्त पालेभाज्या नागरिकांच्या आरोग्यासाठी फलदायी ठरतात. मात्र आधुनिक शेतीच्या नावाखाली तणनाशकांच्या फवारणीमुळे बहुतांश करुन रानभाज्या नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता बाजारात उपलब्ध पालेभाज्यांवरच समाधान मानावे लागत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे.
पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागात महिनाभरातच रानभाज्या रोजच्या जेवणात मिळत होत्या. प्रत्येक भाजीत औषधी गुणधर्म असल्याने या पालेभाज्या लोक आवर्जून खात होते. पण, सध्या या रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. मागील दहा वर्षापासून शेतकरी शेतातील तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करू लागले आहेत. त्यात रानभाज्याही जळू लागल्या आहेत. सध्या तर त्या दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व मजुरांना विनामूल्य मिळणाऱ्या रानभाज्या आहारातून गायब झाल्या आहेत.
रानभाज्या मिळणे मुश्किल झाल्याने लोकांना आता बाजारातील भाज्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशा बाजारू पालेभाज्यांवर होणारा रासायनिक खतांचा वारेमाप वापर आरोग्यास अपायकारक ठरत आहे. शेतामधील तण काढण्यासाठी महिला मजुरांची मोठी आवश्यकता भासते. पण, मजुरीचा खर्च परवडत नसल्यामुळे शेतकरी तणनाशकांचा वापर करतात. पण, त्याचा वापर रानभाज्यांसाठीही घातक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात फक्त पुस्तकांतील पानांवरच रानभाज्या पाहायला मिळतील, की काय? अशी शक्यता निर्माण होत आहे.
रानभाज्या म्हणजे काय?
निसर्गत: उगवलेल्या भाज्यांना रानभाजा म्हणतात. त्या मुख्यत्वे शेताच्या बांधावर येतात. लागवड न करता पावसाळी हंगामात उगवतात. त्यामुळे या वनस्पतीमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये व अत्यंत उपयोगी असे घटक आढळतात. त्यांची जपणूक भविष्याच्या दृष्टीने आणि भावी पिढीसाठी हितकारक आहे.