शेतकरी चिंतेत
पुसेगाव (प्रतिनिधी) – पुसेगाव परिसरात गेले काही दिवस सकाळी पडत असलेले दाट धुके व ढगाळ हवामानामुळे नगदी पिके असलेल्या कांदा, बटाटा, आले आदी पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने आणि कांदा, बटाट्याला मिळालेल्या प्रचंड भावामुळे पुसेगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कांदा व बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. या वर्षी थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे कांद्यास अनुकूल हवामान तयार झाले नाही. मागील आठवड्यापासून हवामानात सतत बदल होऊन थंडीचे प्रमाण कमी-जास्त होत आहे.
ढगाळ हवामान आणि सकाळच्या दाट धुक्यामुळे कांदा व बटाटा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. कांद्यावर मावा, तुडतुडे, रस शोषणारी कीड, करपा व आकडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पातीचे शेंडे करपणे, माना वाकड्या होणे व पाती पिवळसर पडणे, असे प्रकार होत आहेत. या हवामानामुळे कांद्याच्या व बटाट्याच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढल्याने नगदी पिकांसाठी पोषण वातावरण तयार होत होते. पिके चांगली वाढून खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, हवामान बदलामुळे नुकसानीची चाहुल लागल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराश पडत आहे. पिकांवर महागड्या औषधांची फवारणी केल्यानंतरही फारसा फायदा होणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
चांगला बाजारभाव चांगला मिळाला तरीही लहरी हवामानामुळे रोग पडून उत्पादन कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे लागवडीसाठी झालेला खर्च तरी वसूल होईल का, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. हवामान बदलामुळे पहाटेपासून सकाळपर्यंत दाट धुके पडत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.