मुंबई – कार चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने कारची बसला जोरदार धडक बसून चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी जवळील पिंपळास गावाजवळ पहाटे 3:40 वाजता घडला आहे. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे.
गोकूळ मधुकर गवते (वय-29, रा. निफाड नाशिक), पंकज भगीरथ जावळे (वय-29, रा. अहमदनगर), ज्वाला विजय बहादूर सिंग (वय-27, रा. नाशिक), गौरव सुधीर सिंग (वय-27, रा. नाशिक) यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण नाशिक येथून मुंबईकडे जात होते. पिंपळास गावाजवळ कारचालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यामधील दुभाजकावर आदळून विरूद्ध दिशेला फेकली गेली. त्याचवेळेस मुंबई-बोरिवली-नाशिक-शिर्डीकडे जाणाऱ्या एका खासगी बस आणि कारमध्ये जोरदार धडक झाली.
हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा चेंदामेंदा होऊन गाडीमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात पाठव्यात आले. कानेगाव पोलीसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.