नगर -“महाआघाडीच्या सरकारने केवळ अर्थाचा विचार न करता त्यातून होणाऱ्या भयानक अनर्थाचा विचार करून दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय मागे घ्यावा’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी केली आहे.
याबाबत देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. राज्य शासनाच्या या आत्मघातकी निर्णयात हस्तक्षेप करण्याबाबत विनंती करणारे पत्र कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी देखील पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, करोनाच्या संकटामुळे देशात व राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडे जमा होणाऱ्या महसुलात घट होत आहे. हे जरी खरे खरे असले तरी सरकारच्या अर्थाजनासाठी घेतलेला हा निर्णय जनतेसाठी ‘अनर्थकारक ठरु शकतो. दारूची दुकाने खुली करण्याच्या निर्णयानंतर दारूच्या दुकानासमोर होणारी गर्दी ही अत्यंत भयावह असून दारू पिल्यानंतर ‘सोशल डिस्टंसिंग’ चे नियम पाळण्याची अपेक्षा हास्यास्पद आहे.
या सर्व प्रकारामुळे आत्तापर्यंत जवळपास साठ दिवस अत्यंत शिस्तीने पाळलेल्या “लॉकडाऊन’ चा पराभव होऊ शकतो व त्यामुळे आगामी काही दिवसात “करोना’ संसर्ग अत्यंत वेगाने होऊ शकतो. दारूच्या करातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त पैसे आरोग्य सेवेसाठी लागण्याची भीती देशमुख यांनी व्यक्त केली आहे.