लॉकडाऊनने प्रत्येकाला अगदी स्थानबद्ध केले आहे यात वाद नाही. मोठमोठ्या शहरांचे आपण व्हॉट्सऍपवर आलेले निर्मनुष्य फोटो पाहिले असतीलच. सर्व स्थळे शांत, सुंदर व निरव दिसत आहेत. कित्येक अभयारण्यातील विविध प्राणीही मुक्तपणे जवळपासच्या रस्त्यांवर विहार करताना दिसत आहेत. मानवाचा हस्तक्षेप काही काळापुरता टाळल्याने ते अगदी मुक्तपणे विहार करत आहेत. आपण आपली इच्छा या जीवांवर कशी लादली होती तेच यातून समजून येते. आपल्या येथे कुणालाही बाहेर पडता येत नाही. कित्येक नेहमीची दुकाने बंद आहेत तसेच छोटे मोठे उद्योग तात्पुरते गुंडाळले गेले आहेत. रिक्षा, टॅक्सी, गाड्या बंद आहेत. किरकोळ दुधवाल्यांनाही बाहेर पडणे कठीण आहे तसेच सलून वगैरे बंद आहे रोजंदारीचे नेहमीचे कामही बंद झालेले आहे.
सर्वत्र मंदीची पकड दिसत आहे. विविध हॉटेल्स तसेच बारही बंद झालेत व तळीरामांची थोडी पंचाईत झालेली आहे. केवळ आवश्यक सेवा म्हणजे किराणा, डेली नीड्स, औषधे, भाजीपाला एवढीच दुकाने सुरू आहेत. आर्थिक व्यवहार सर्वत्र आक्रसून गेलेले आहेत. कित्येकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे पण अजून काही कालावधी जावा लागेल.
आता ही झाली एक बाजू. यातून आपण सर्वत्र वाईट परिस्थिती पाहिली. पण यातून काही चांगल्या गोष्टी होत आहे असे नाही का वाटत? कित्येक लोकांना काही वाईट सवयी असतात.
आता वाईट ही देखील सापेक्ष संकल्पना आहे पण सर्वसाधारण समाज किंवा घरातील लोकांना एखाद्याची एखादी सवय आवडत नसते. मग ते धूम्रपान असो तंबाखू, गुटखा वा मद्यपान. उगाचच बाहेर फिरत राहणे किंवा दुसऱ्यांच्या घरी सतत जाऊन वेळ घालवणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. एवढेच नाही तर कित्येक सरकारी वा इतर आस्थापनांमध्येही उघडउबड लाच घेतली जाते तीही सध्या बंद आहे. कित्येक बदनाम खात्यांमध्येही अशी चिरीमिरी सध्या बंद, कारण कामच बंद आहे. ज्या व्यक्ती अशी चिरीमिरी घेतात त्यांनाही सध्या ती मिळत नाही. आपले जे काम सुरू असेल किंवा घरातून चालणारे काम व मिळणारा पगार यावरच समाधान मानावे लागणार आहे. किती जणांना लॉटरी व इतर अर्थाच्या जुगाराचे व्यसन असते ज्यामध्ये पगारातील खूप वाटाही बरबाद होतो. आता या वरील उल्लेख केलेल्या बहुतेक गोष्टींना सध्या सुट्टी आहे.
आता या अनिवार्यतेकडे अशा संबंधित व्यक्तीने एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. अशा गोष्टी ज्या समाज किंवा आपल्या घरातील लोकांना आवडत नाहीत त्या सध्या या बंदीमुळे बंद आहेत. मग त्याच्या संबंधित व्यक्तीने अशा सवयीतून बाहेर पडण्याचा हा एक मार्ग आहे व तो निरंतर पुढे चालू ठेवला तर प्रत्येकाचे कल्याण होणार नाही का? अतिमद्यपान किंवा तंबाखू, गुटखा यामुळे आपल्या शरीरावरही विपरीत परिणाम होत असतो आणि जर व्यक्ती खूप आहारी गेली की पुन्हा डॉक्टरांकडे जाणे आले व त्याचा होणारा खर्च वेळ व सर्वांनाच होणारा मनस्ताप यातून बाहेर पडण्याची हीच संधी आहे.
आपल्या गरजा अधिक नसतील तर अतिरिक्त पैशांचीही गरज भासणार नाही व लाचखोरीला आळा बसेल. उगाच चैन व उधळपट्टी नसेल तर खर्चही कमी होईल. प्रत्येकाने अशा अनावश्यक गोष्टींपासून दूर राहिल्यास अशा विविध सवयी कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच प्रत्येकाने या आपत्तीस एक इष्टापत्ती समजून आपल्यामध्ये आवश्यक ते बदल घडवावे जे आपल्या कुटुंबासह समाजास निश्चित आवडतील.