चंदीगड – नेतृत्वबदलानंतरही पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह सुरूच आहे. मंगळवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ कॅबिनेट मंत्री रजिया सुलतान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना लिहिलेल्या पत्रात राजीनामा देत असल्याचं म्हंटलं आहे.
“मी रजिया सुलतान नवज्योत सिंग सिद्धू यांच्या व राज्यातील लाखो काँग्रेस कर्यकर्त्यांच्या समर्थनार्थ कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देते. मी यापुढे एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम सुरु ठेवेन” असं सुलतान यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रामध्ये म्हंटलं आहे.
दरम्यान, सिद्धू यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण तडजोड करू शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचं सिद्धू यांनी पत्रात म्हंटल. सिद्धू यांनी अचानक राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलानंतरही धुसफूस कायम असल्याचं दिसतंय.
सिद्धू यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धू हे अस्थिर असल्याचं म्हंटल. तसेच पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यासाठी सिद्धू यांचे नेतृत्व योग्य नसल्याची टीका देखील अमरिंदर यांनी केली आहे.