नवी दिल्ली – कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थतेचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत.
कॉंग्रेसमधून महत्वाच्या नेत्यांचे बाहेर पडण्याचे सत्र सुरूच आहे. त्याशिवाय, पंजाबमधील घडामोडी पक्षापुढे पेच निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.
त्या घडामोडींचा संदर्भ घेऊन पक्षातील असंतुष्ट मानल्या जाणाऱ्या 23 नेत्यांच्या गटातून पुन्हा पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्या गटाचा भाग असणाऱ्या गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी पुन्हा नाराजीचा सूर आळवला.
त्याशिवाय, पक्षांतर्गत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तातडीने कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मागील आठवड्यातच लवकरच कार्यकारिणी बैठक बोलावण्याचे संकेत दिले.
त्यानुसार, पुढील काही दिवसांत ती बैठक होऊ शकेल, असे त्यांनी म्हटले. कॉंग्रेसमधील सध्याच्या घडामोडी पाहता कार्यकारिणी बैठक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.