गुवाहाटी – आसाममधील विविध संघटनांनी सीएएला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी निदर्शनांचे सत्र सुरू करण्याचा आणि कायदेशीर लढा पुढे नेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आसाममधील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
ऑल आसाम स्टुडंटस् युनियन (आसू) आणि मूळचे रहिवासी असणाऱ्यांच्या ३० संघटनांनी सीएएच्या प्रतींचे दहन करण्याशी संबंधित निदर्शनांची घोषणा केली आहे.
आसाम आणि देशाच्या ईशान्य विभागातील मूळचे रहिवासी कधीच सीएए स्वीकारणार नाहीत, अशी भूमिका त्या संघटनांनी मांडली. सीएएशी संबंधित विधेयक केंद्र सरकारने आणले तेव्हापासून आसाममध्ये निदर्शनांना प्रारंभ झाला.
त्या निदर्शनांमध्ये आसू आघाडीवर आहे. त्या संघटनेने याआधीच सीएएविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आसाममधील विरोधी पक्षांनीही सीएएवरून सत्तारूढ भाजपवर टीकेची झोड उठवली.
दरम्यान, आसाममधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्या राज्यातील संवेदनशील भागांत गस्त वाढवण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
देशात करोना संकट दाखल होण्याआधी सीएएविरोधी निदर्शनांमुळे आसाम ढवळून निघाले होते. त्या निदर्शनांवेळी हिंसाचार होऊन ५ जण मृत्युमुखी पडले होते.