नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व कायद्याला (का) विरोध करण्यासाठी देशभरात शेकडो निदर्शकांना ताब्यात घेतले. कर्नाटकातील मंगळुरू येथे पोलिस आणि निदर्शकांत झालेल्या संघर्षात दोन जण मरण पावले. लखनऊमध्येही गोळ्यांनी जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कर्नाटकचे जीवन गुरूवारी ढवळून निघाले. मंगळुरू येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. अशीच निदर्शने देशभरात ठिकठिकणी झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच देशातील परिस्थितीवर भाष्य केले.
नरेंद्र मोदी म्हणाले कि, देशाला संकटातून बाहेर काढताना अनेक लोकांची नाराजी ओढावून घ्यावी लागते. अनेक आरोप होतात. पण ७० वर्षाची सवय बदलण्यासाठी वेळ लागतो. मात्र, देशासाठी करायचे असल्याने हे सर्व सहन करावे लागते. आज देशात असे सरकार आहे जे शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योग क्षेत्र सर्वांचे म्हणणं ऐकून घेते. त्यांचा गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यांनी दिलेल्या सूचनांवर काम करते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीत द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडियाच्या (असोचम) कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी ते अर्थव्यवस्थेवर बोलत होते. याप्रसंगी मोदींनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर सूचक वक्तव्य केले आहे.