संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
पुणे – कात्रज येथील बायोगॅस प्रकल्पामध्ये अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी मुख्यसभेत दिली. तसेच याचा चौकशी अहवाल 15 दिवसांत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कात्रज येथील बायोगॅस प्रकल्पामध्ये झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी उपस्थित केला. कात्रजमध्ये फुलराणी, अभ्यासिका, उद्यान असे अनेक प्रकल्प उभे केले. 2011 मध्ये “स्वच्छ कात्रज, निर्मळ कात्रज’ अंतर्गत पहिला बायोगॅस प्रकल्प सुरू केला. नागरिकांच्या विरोधानंतरही हा प्रकल्प केला. याला अगदी विदेशातील अभ्यासकांनी भेट दिली.
या प्रकल्पामुळे ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सवय लावण्याचा प्रयत्न झाला. 2017 पर्यंत चांगल्या पद्धतीने चालला. मात्र, त्यानंतर निवडणुकीत हा प्रकल्प दुसऱ्या प्रभागात गेला. पूर्वी या प्रकल्पात गॅसपासून निर्माण होणाऱ्या विजेवर प्रकल्प, फुलराणी आणि पथदिवे चालायचे. मग असे काय झाले की दोन वर्षांत हा प्रकल्प बंद पडला. हा प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीला हे काम मिळू नये यासाठी प्रयत्न केला गेला, असा आरोप मोरे यांनी केला.
प्रकल्प बंद असताना तेथील मोटर चोरीला गेली. गॅस जमा करण्यासाठीचा बलून फोडण्यात आले. मागील 7 महिन्यांपूर्वी हा प्रकल्प चालू करण्यासाठी महापालिकेने 49 लाख रुपये खर्च केले. दररोज 6 टन कचरा जिरवला जातो असे सांगितले गेले. परंतु पाहणी केली त्यावेळी येथून कचरा उचलून नेला जातो आणि हॉटेलमधील कचऱ्यावर येथे प्रक्रिया केली जाते. जेमतेम एक टन कचरा जिरवला जात असताना 6 टनाचे बील दिले जाते. याठिकाणी एमएसईबीची वीज वापरली जाते. एका प्रकल्पावर एवढा भ्रष्टाचार होतोय तर इतर 26 प्रकल्पांवर काय होत असेल, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला.
या प्रकल्पांचे ऑडिट करावे. कचऱ्यातून पैसा खाणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी केली. अधिकाऱ्यांच्या संमतीने कचऱ्याचा पैसा कोणाच्या खिशात जातोय याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली होती.