अकोले -कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत 10 मेला पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडण्याचे निश्चित झाले असताना ते 27 एप्रिलला पाणी कोणाच्या आदेशाने सोडण्यात आले? असा सवाल शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रभाकर फापाळे व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. डी. के. सहाणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या मेलद्वारे केला आहे.
मागणी नसतानाही मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी मंगळवारी अचानक सोडण्यात आले. आमदार अंधारात आहेत की आमदारांच्या सांगण्यावरून आवर्तन सोडले गेले?हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून पाण्यावाचून तालुका भकास करण्याचे हे षडयंत्र तर नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पाणी सोडण्यापूर्वी नदीच्या कडील सर्व गावांना ग्रामपंचायतमार्फत दंवडी वजा सूचना देण्यासाठी संबंधित खात्याने ग्रामपंचायतीना पत्र देणे अपेक्षित असताना तसे काही आदेश प्राप्त नाहीत. यामुळे हे आवर्तन वादग्रस्त बनले आहे,असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
यंदा पाणी परिस्थिती चांगली आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे विहिरींना ही पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केलेली नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पिंपळगाव खांड धरणात पाणी शिल्लक होते. ते पाणी 10 मे नंतर सोडायला पाहिजे होते. त्यामुळे जून महिन्यात लोकांना पाणी उपयोग झाला असता. पूर्वी मुळा नदीवर धरणे नव्हती, तेव्हा नदीला लवकर पाणी येत असे. मात्र आता लहान मोठी पाटबंधारे प्रकल्प झाल्यामुळे आता नदीत पात्रात उशिरा पाणी येते.
असेही त्यांनी त्यात सांगितले असून पावसाळा लांबणीवर पडला तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पिण्याच्या पाण्याची अडचण येणार आहे. असे स्पष्ट करून अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत की असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आवर्तन तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी कैलासराव शेळके, उल्हास गोडसे, बाळासाहेब शेळके, ऍड. भाऊसाहेब गोडसे, विक्रांत शेळके, सुनील चौधरी, संजय साबळे आदींनी केली आहे.