कोपरगाव -लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा आठवड्यातून तीनच दिवस सुरू राहणार असल्याने आज नागरिकांनी शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, धारणगाव रोड, निवारा कॉर्नर परिसर आदी भागात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला. काही भागांमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांना मास्क लावा, थुंकू नका, अंतर पाळून खरेदी करा, असे सांगत होते. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे आज शहरामध्ये दिसून आले.
तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र प्रशासनाने शेजारील तालुक्यात काही भाग हॉटस्पॉट जाहीर केल्याने खबरदारी घेऊन तालुक्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तालुक्याच्या सीमेवर पोलीस व महसूल प्रशासनाची करडी नजर आहे. येवला, मालेगाव, संगमनेर या भागातून कोणीही नागरिक कोपरगाव तालुक्यामध्ये येणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी देखील नागरिकांना या तालुक्यांत ये-जा करणाऱ्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही केले आहे.
शहरात आज दोन दिवसांच्या अंतरानंतर अत्यावश्यक सेवा सुरू होती. मात्र शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केल्याने प्रशासन हतबल झाले. किराणा दुकानांमध्ये सर्वाधिक गर्दी दिसून आली. शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी गर्दी कमी करण्याची सूचना केली. मात्र गर्दी वाढतच गेल्याने अखेर सदर किराणा दुकान बंद करण्यात आले.
मुख्य रस्त्यावर देखील नागरिकांनी भाजी बाजार व इतर साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शासकीय नियमांची नागरिकांनी ऐशी तैशी केली. नगरपालिकेचे कर्मचारी चौकात उभे होते. त्यांचा कारवाई करण्याचा धडाका सुरू होता. तालुक्यातील नागरिकांनी करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सतर्क राहून प्रशासनाला मदत करणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसून येत नाही.
शहरातील गल्लोगल्लीतही नागरिक घोळक्याने अजूनही उभे राहात असून, गप्पांचे फड रंगत आहेत. त्यामुळे शासन नेमके कोणा कोणाकडे लक्ष देणार, हा प्रश्नच आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अत्यावश्यक सेवा आठवड्यातून एकदाच सुरू ठेवावी, असे आवाहन प्रशासनाला केली आहे. मात्र तीन दिवस ही सेवा सुरू असताना देखील शहरामध्ये मोठी गर्दी होते, तर एक दिवस अत्यावश्यक सेवा चालू ठेवली, तर किती गर्दी होईल, याचा विचार न केलेलाच बरा.
बाजार समिती आवारातही नियमांना हरताळ
शहरातील संजयनगर भागामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी विक्रेत्यांनी व शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळीही सोशल डिस्टन्सिंग, जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाला सर्रासपणे वाटाण्याच्या अक्षता लावत गर्दी करण्यात आली.