मुंबई – अमेरिका आणि युरोपातील परिस्थिती सुधारण्याची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घ पल्ल्याचा विचार करून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. अनिश्चित वातावरणातही शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 72,186 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 157 अंकांनी म्हणजे 0.72 टक्क्यांनी वाढून 21,929 अंकावर बंद झाला.
एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस, मारुती, इन्फोसिस, टाटा स्टील, भारती एअरटेल, स्टेट बँक, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. एअरटेल कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी वाढला. या कंपनीची नफा 54 टक्क्यांनी वाढल्यामुळे या शेअरला जास्त मागणी होती.
मात्र पावर ग्रीड, इंडसइंड बँक, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी होण्यास मदत झाली.
दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बर्याच दिवसानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदी केली. सोमवारी या गुंतवणूकदारांनी 518 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र एकूण जागतिक परिस्थिती पाहता भारताबरोबरच इतर वेगाने विकसित होणार्या देशातून हे गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहेत.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार शेअर बाजारातून विक्री करीत असले तरी रोखे बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. तांबड्या समुद्रातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर खनिज तेलाच्या किमती सध्या अस्थिर आहेत. याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले.