सातारा – कास पठारावरील यंदाचे पर्यटन तेथे सुरू होणाऱ्या ई बससाठी सध्या चर्चेत आहे. राज्य शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प असून जिल्हा प्रशासनाने त्याच्यामध्ये समन्वयकाची भूमिका घेतली आहे. कास आणि परिसरातील तरुणांनी भविष्यात प्रदूषणमुक्त पर्यटनासाठी कास पठारावर खासगी ई बस चालवाव्यात, यातून रोजगार निर्मिती होईल. त्याकरिता लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले. त्यामुळे भविष्यात कास पठारावर खासगी ई बस धावायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको.
कास पठार हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथील वनसंपदा, अन्नसाखळी व त्याचा नैसर्गिक अधिवास टिकून राहण्याकरिता राज्य शासनाचा पर्यटन विभाग कामाला लागला आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कास पठारावर ई बस सुरू करण्यासंदर्भात कमालीचे स्वारस्य दाखवून यंत्रणा तत्काळ कामाला लावली. जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी सातत्याने या प्रकल्पाच्या शीर्षस्थानी असून त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणार आहे. पर्यटन महामंडळ, जिल्हा प्रशासन यांनी काही एम्प्लॉयमेंट स्टार्टअप सुरू करण्यासंदर्भातही छोटे छोटे आराखडे तयार करण्यासाठी सुचविले आहे.
या टप्प्यामध्ये कास पठारावर कायमस्वरूपी ई बस सुरू करण्यासाठी कास भागातील तरुणांनी रोजगाराच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा आणि समूह गटाच्या माध्यमातून एखादी ई बस खरेदी करून ती सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध केली तर त्याला पठारावर चार्जिंग स्टेशनची सुविधा तसेच पार्किंग स्थळ इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील व तरुणांना या संदर्भात कर्ज सुविधा सुद्धा विशिष्ट बॅंकांच्या माध्यमातून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना दिले.
प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा
यासंदर्भामध्ये प्राथमिक टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडा बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पर्यटन महामंडळ तसेच कास पठारावरील ग्रामस्थ कार्यकारी समितीच्या सदस्यांशी चर्चा करून काय काय सुविधा उपलब्ध करून देता येईल, याचा आराखडा केला जाणार आहे, असे रुचेश जयवंशी यांनी सांगितले. सध्या कास पठारावर धावणारी बस गणेश खिंड ते कास पठार या दरम्यान धावणार आहे. गणेश खिंड येथील पार्किंग स्थळ तात्पुरत्या स्वरूपात राहणार आहे. भविष्यात समतल पठारावर जागा उपलब्ध झाल्यास तेथे सोयीनुसार पार्किंग स्थळ निर्माण केले जाईल. सातारकरांनी स्वतःच कास पठारावरचे पर्यावरण प्रदूषणमुक्त राहावे, यासाठी पुढाकार घेऊन पेट्रोलवर चालणारी वाहने पठारावर आणू नयेत. हा बदल त्यांचा उत्स्फूर्त आणि स्वाभाविक असावा. भविष्यामध्ये ई बस हाच पर्याय त्यांनी पुढे अंमलात आणावा, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.