नवी दिल्ली – उत्तर प्रदेश करकारच्या सहकाऱ्याने केंद्र सरकार अयोध्या शहराला जागतिक दर्जाचे पर्यटनाचे शहर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टाने एक महत्वाचे पाऊल म्हणून केंद्र सरकारने नवी दिल्ली ते अयोध्या दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नवी दिल्लीला वाराणसी आणि प्रयागराज दरम्यान हायस्पीड बुलेट ट्रेन सुरू करण्याचाही केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे समजते आहे.
दरम्यान दिल्ली ते अयोध्या दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्यासंदर्भात चाचपणी करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या एका पथकाने अलिकडेच अयोध्येला भेट दिली होती आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबर चर्चा केली होती.
यावेळी बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठीची जागा निश्चित करण्याबाबत चर्चा झाली असे समजते आहे. राज्य सरकारकडून “एनएचआरसी’ला बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी जागा देण्याचेही निश्चित केल्याचे समजते आहे. हे स्टेशन मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र विमानतळाजवळच असणार आहे. हा विमानतळ लखनौ-गोरखपूर महामार्ग बाह्यवळण मार्गाजवळ उभारला जात आहे.
या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे अयोध्येला थाट दिल्लीशी जोडले जाणार आहे. या मार्गसाठीची हवाई पहाणी करण्यात आली आहे, असे “एनएचआरसी’चे कार्यकारी संचालक अनुप कुमार अगरवाल यांनी सांगितले.