नवी दिल्ली – जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमती वाढत असल्याने यंदा निर्यातीच्या
उद्दीष्टापेक्षा दहा लाख टन जास्त साखर निर्यातीचे करार साखर कारखान्यांनी केले आहेत. यंदा
60 लाख टन साखर निर्यातीचे उद्दीष्ट आहे मात्र, देशातील साखर कारखान्यांनी आत्ताच 70
लाख टन साखर निर्यातीचे करार केले असल्याचे अन्न मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढत असल्याने मंत्रालयाने कारखान्यांना 2021-22
च्या हंगामात निर्यातीसाठी कच्च्या साखरेच्या उत्पादनाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला
आहे.
त्यानुसार कारखान्यांनी निर्यातदारांबरोबर वायदे करावेत असे मंत्रालयाने म्हटले आहे.
रेटींग एजन्सी इक्राने बुधवारी ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या 2021-22 च्या हंगामातील साखर
निर्यातीचा अंदाज वर्तवलेला आहे.
गेल्या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किंमती वाढत असल्याने येणारा हंगाम हा अधिक चांगला असेल असे इक्राने म्हटले आहे. साखरेला चांगला भाव मिळाल्याने कारखान्यांना उस उत्पादकांची थकीत देणी देणे शक्य होणार आहे.