नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली. यात देशाला ‘वंदे भारत 2.0, हायड्रोजन ट्रेन’ची भेट दिली आहे. या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 2013 सालचा विचार करता नऊ पटीने बजेट वाढवल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितले. रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. तसेच रेल्वेमध्ये 100 नवीन महत्त्वाच्या योजनांची लागू करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
दरम्यान अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाले की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.”
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या आर्थिक वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे. 2013-14 च्या तुलनेत हे नऊ पटीने जास्त वाटप असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संपूर्ण रेल्वे प्रणालीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रेल्वे बजेटमध्ये 20-25 टक्क्यांनी वाढ करण्यावर काम करत आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवर लक्ष केंद्रित केलं होतं. यंदाच्या अर्थसंकल्पातही यालाच सरकारचे प्राधान्य राहणार आहे असल्याचे त्या म्हणाल्या. या वर्षी, रेल्वेला देण्यात येणारा निधी नवीन ट्रॅक टाकण्यासाठी, अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जाईल, असे अर्थमंत्री यांनी यावेळी जाहीर केले.
2022-23 मध्ये, वृद्धांना भरघोस अनुदानासह प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बहुतांश सवलती बंद केल्यानंतर रेल्वेने मोठ्या प्रमाणात बचत केली होती. तसंच मार्गांच्या विद्युतीकरणामुळेही बचत झाली होती. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 2022-23 मध्ये आतापर्यंत 41,000 कोटी रुपयांचा अधिक महसूल कमावल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. भारतीय रेल्वेला या आर्थिक वर्षात एकूण रु. 2,35,000 कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.