नवी दिल्ली – पर्यटन मंत्रालयासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींत तब्बल 19 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाने झटका दिल्याची भावना पर्यटन उद्योगातून व्यक्त केली जात आहे.
पर्यटन मंत्रालयाला 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 2 हजार 500 कोटी रूपये उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, पुढील वर्षासाठी केवळ 2 हजार 26 कोटी रूपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल पर्यटन उद्योगातून नाराजीचा सूर उमटला आहे.
करोना संकटामुळे पर्यटन क्षेत्राला प्रचंड आर्थिक फटका बसला. पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्रांशी निगडीत उद्योग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. त्यामुळे पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा होत्या. मात्र, भ्रमनिरास झाल्याच्या प्रतिक्रिया पर्यटन उद्योगाकडून दिल्या जात आहेत.