पुणे(प्रतिनिधी) – शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो, नदी सुधारणा, स्मार्ट सिटी अशा तीन महत्त्वाच्या योजनांना चालना देण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद नसल्याने पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे अशी टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या राज्यात तरतुदींची खैरात करणारा असल्या कारणाने तो देशाचा अर्थसंकल्प न रहाता भाजपचा पक्षीय अर्थसंकल्प झाला आहे आणि त्यात पुणे-मुंबईवर अन्याय करण्यात आला आहे.
नव्या आर्थिक वर्षात पुण्यातील मेट्रो विशेषतः पुणे-हिंजवडी मार्गाला गती मिळण्यासाठी विशेष निधीची गरज होती. भाजपकडून गाजावाजा होत असलेली मुठा नदीसुधार योजना एव्हाना पूर्णत्वास जायला हवी होती. ते झाले नाहीच. उलट काम ठप्प झाले आहे. या योजनेसाठी भरीव निधीद्वारे चालना मिळणे गरजेचे होते. परंतु, त्यावरही भरीव तरतूद नाही. रेल्वेच्या हडपसर टर्मिनसच्या कामालाही चालना मिळालेली नाही, स्मार्ट सिटी योजना संथ गतीने चालू आहे. त्यासाठीही निधीची तरतूद नाही. पुरंदर विमानतळ योजनेसाठी भक्कम निधीची तरतूद नसल्याने योजनाअधांतरी राहाणार आहे. एकंदरीतच मोदी सरकारचा अर्थसंकल्प पुण्यासाठी घोर निराशा करणारा असल्याचे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. अंदाजपत्रकातून त्यालाही दिलासा मिळालेला नाही. कोविडच्या साथीमुळे अनेकांचे उत्पन्न घटले. त्यामुळे आयकरातून सूट मिळावी अशी अपेक्षा होती ती ही फलद्रूप झालेली नाही. नोटाबंदीपासून ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्हे या अर्थसंकल्पातून दिसत नाहीत असेही मोहन जोशी यांनी म्हटले आहे.