राजेंद्र वारघडे
पाबळ -जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या महिला नेत्या आशा बुचके यांचा भाजप प्रवेश नुकताच झाला. यानिमित्ताने भाजपचाही खऱ्या अर्थाने जुन्नरच्या माध्यमातून शिरूर लोकसभेमध्ये प्रवेश झाला. वरवर नैमित्तिक वाटणारी ही घटना शिरूर लोकसभेतील सहाही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला बाधित करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिरूर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा सलग निवडणुका जिंकले. त्यावेळी तडजोडीच्या राजकारणात त्यांची आमदारांना आणि आमदारांची त्यांना मदत झाली. यातील राजकीय साटेलोट्यामुळे आशा बुचके यांना,
तीन वेळा आमदारकी लढवूनही पराभवाला व शिवसेनेतून हकालपट्टीला सामोरे जावे लागले. तरीही पक्ष न सोडण्यावर ठाम असलेल्या आशाताईंना मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले आणि त्यांना भाजप प्रवेशाचा निर्णय घेऊन अंमलात आणावा लागला.
दरम्यान चौथ्या वेळी शिवाजीराव आढळराव यांना पराजय पत्करावा लागला. खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करून राजकीय साटेलोटे होऊ नये, याची काळजी घेत शिरूरची जागा ताब्यात घेतली. साटेलोट्यातून आमदारकी मिळवणारे सर्वच पक्षाचे नेते आलटून-पालटून पराभवाला सामोरे गेले.
त्यातूनच आशा बुचके यांनी भाजपची वाट धरली. भाजपच्या माध्यमातून त्यांच्यातील आमदारकीची आणि भाजपच्या खासदारकीची ही स्वप्ने पुनरुजीवीत झाली. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला त्याचवेळी भाजपलाही आपले कार्यक्षेत्र विस्तृत करायला, जुन्नरबरोबर शिरूर लोकसभेसाठी चेहरा व मोहरा मिळाला.
कडबोळ्याचे आघाडी सरकार कधीही पडू शकते हा भाजपचा अंदाज गडबडला. यातून शिवसेना पुन्हा दोस्तीत येत नाही ही बाबही स्पष्ट झाली. त्यामुळे “एकला चलो रे’ हा कार्यक्रम राबवित महाराष्ट्र काबीज करण्यासाठी, करावयाच्या प्रयत्नात आशाताईंसारखा मोहरा मिळवून शिरूरसारख्या राष्ट्रवादीच्या गडातील जुन्नर परगण्यात भाजपने पहिला
तंबू ठोकला.
…राजकारणात मुंबईकर बाहेर, प्रस्थापित आत
पूर्वाश्रमी भाजपच्या मुंबईमध्ये नगरसेवक असलेल्या आशाताईंनी स्वतःचे बुचकेवाडी गाव कर्मभूमी केली आणि चार वेळा विविध गटांतून जिल्हा परिषदेत विजय मिळवून दाखवला. बाळासाहेब दांगट यांच्यानंतर शिवसेना सर्वदूर नावारूपाला आणली. त्यानंतर दुसऱ्या
मुंबईकरांनी मनसे नावारूपाला आणत एकमेव आमदार म्हणून मनसे पक्षाला प्रकाशात आणले; मात्र त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश त्यांच्या पराजयात बदलला. आणि आशाताईंना सलग तीन वेळा आमदारकी साठी पराभव पत्करावा लागला. परिणामी त्या मूळ पक्षात परतल्या.
साटेलोटे… भाजपसाठी?
वास्तविक भाजपच्याच भोकाडीने तीन पक्ष एकत्र आले. सध्या राज्यात समान कार्यक्रम तीन पक्षांसाठी वरदान ठरला. भाजपही सरकार भांडून पडेल याची वाट पहात कंटाळली आणि त्यांनी निवडणुकांची तयारी सुरूही केली.
तीन पक्षांत पुन्हा साटेलोटे होईल आणि तिकीट वाटप होईल, असा आशावाद असल्याने कोणताही पक्ष धडक भूमिका घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशात निवडणुका जवळ आल्यावर, हा समान कार्यक्रम फक्त राज्य शासन चालवण्यासाठी होता. निवडणुकीसाठी नव्हता अशी भूमिका पुढे आली तर मात्र साटेलोटे…. भाजपसाठी?
खासदारकीसाठी बेरजेचे राजकारण
सध्या भाजपकडे भोसरीची एकच जागा आहे. जुन्नरच्या जागेच्या “आशा’ पल्लवित झाल्या आहेत. शिरूरची जागा हातात होती; परंतु यावेळी निसटली. हवेलीत भाजप स्थिरावत असताना, खेडमध्ये एक ट्रायल झाली आहे. आंबेगावमध्ये जोर लावावा लागेल.
या गृहितकाचा आधार घेत भाजप सर्वशक्तीनिशी शिरूर लोकसभा मिळवण्यासाठी गंभीर पावले उचलणार. परिणामी राष्ट्रवादीला हा विषय बाधित होणार, हे निश्चित असल्याची चर्चा आहे.