नागपूर – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रातील आगामी महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी चंद्रशेखर राव यांनी यंदाच्या महाराष्ट्रातील वारीदरम्यान देखील फ्लेक्सबाजी केल्याचे पाहायला मिळाले. आता भाजपाला शह देण्यासाठी राव यांनी थेट नागपूरकडे आपला मोर्चा वळवला आहे.
चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. यापूर्वी त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरात सभा देखील झाल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. आता के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात भारत राष्ट्र समितीच्या पहिल्या कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करत भाजपच्या बालेकिल्ल्यात धडक दिली आहे.
भारत राष्ट्र समितीच्या वतीने आज नागपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या निमित्ताने के. चंद्रशेखर राव हे आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग नागपुरातून फुंकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार आहे. उद्धव ठाकरेंना सोडून भाजपशी हात मिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रलंबित आहेत. अशात के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. मराठी माणूस या नव्या पक्षाला कितपत प्रतिसाद देणार याच चित्र आगामी काळात स्पष्ट होणार आहे.