नेवासे (प्रतिनिधी) – भानसहिवरेत (ता. नेवासे) जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. नईम अब्दुल्लतीफ देशमुख (वय 55 ) असे या मारहाणीत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी नेवासा पोलिसांनी भावकीतील तिघाजणांना तत्काळ अटक केली आहे.
मयत नईम देशमुख व त्यांचा भाऊ नदीम अब्दुल्लतीफ देशमुख व मोईन अब्दुल्लतीफ देशमुख, रफिक अब्दुल्लतीफ देशमुख यांच्यात भानसहिवरे येथील जमिनीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. मात्र, त्यावर तोडगा निघत नव्हता.
रविवारी (दि.20) हे चौघेही भाऊ नगरहून भानसहिवरे येथे जमीन वाटपासंदर्भातील वाद कायमचे मिटविण्यासाठी आले होते. तथापि, वाद मिटण्याऐवजी त्यांच्यात तेथे अगोदर शाब्दीक बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यावसन भांडणात झाल्याने नईम देशमुख यांना प्राणास मुकावे लागले.
भानसहिवरे येथील ऐतिहासिक गढीच्या पायथ्याशी असलेल्या एकाटपरीजवळ नईम यांच्यावर तीक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी नगरमधील शासकीय रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नईम यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
या प्रकरणी नेवासे पोलिसांनी नईम देशमुख यांचे सख्खे भाऊ नदीम अब्दुल्लतीफ देशमुख, मोईन अब्दुल्लतीफ देशमुख, रफिक अब्दुल्लतीफ देशमुख या तिघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.