श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – तालुक्यातील बेलवंडी परिसरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील दोन दिवसांत चिंभळा व बेलवंडी येथे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा घालत जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
रविवारी (दि. 20) रात्रीच्या सुमारास चोरट्यानी चिंभळे शिवारातील मोहन माधव जाधव यांच्या घराच्या दाराची कडी उघडून आत प्रवेश केला. तसेच जाधव यांच्या आई-वडिलांना शस्त्राचा धाक दाखवला. यावेळी जाधव यांच्या आईस गजाने मारहाण करून त्यांना जखमी करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील जोडवे व कानातील सोन्याची फुले तोडून नेली.
यात जाधव यांच्या आईच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत मोहन जाधव यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 डिसेंबर रोजी पहाटे तीन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास बेलवंडी गावातील प्रीती सागर इथापे यांच्या बंगल्याच्या किचनचा दरवाजा तोडून चोर घरात शिरले. त्यांनी इथापे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील सामानाची उचकापचक करून त्यांच्या गळ्यातील व घरातल्या कपाटामधील 35 हजार रुपये रोख, एक मोबाईल व सोन्याचे दागिने, असा एकूण 1 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत प्रीती इथापे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी भेट दिली.