सातारा -देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील 42 विद्यार्थी दिल्लीत अडकून पडले आहेत. हे विद्यार्थी तेथे यूपीएससीच्या अभ्यासासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांना तातडीने महाराष्ट्रात आणावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत आ. शिवेंद्रराजेंनी त्यांच्याशी ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून या विद्यार्थ्यांची यादी पाठवली आहे. यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी जिल्ह्यातील 42 विद्यार्थी दिल्लीत गेले आहेत. यामध्ये सातारा शहरातील विद्यार्थीही आहेत. देशव्यापी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. त्यामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा बंद आहेत.
यूपीएससी अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यातील 42 विद्यार्थी दिल्लीत गेले असून तेथेच अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमध्ये या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी पालकांनी केली आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारने दिल्ली सरकारशी संपर्क साधून योग्य पावले तातडीने उचलावीत, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली आहे.