शिंदे वासुली -“करोना’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत दरमहा होणारी हजारो कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. उद्योगांचे आर्थिक चाक थांबल्याने छोटे-मोठे उद्योजकांसह कामगारवर्गास चिंतेने ग्रासले आहे. सोने चांदीसह वाहन, बांधकाम बाजारही पूर्णपणे बंद झाला आहे. 30 एप्रिलनंतर आणखी लॉकडाउन वाढल्यास औद्योगिक वसाहत अक्षरश: कोलमडून जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह त्यावर अंवलबून असलेले छोटे-मोठे उद्योगांची संख्या मोठी असून या औद्योगिक वसाहतीत लाखो कामगार काम करीत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे सर्व उद्योग बंद आहेत.
अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सध्या कार्यरत आहेत. यामध्येही कामगारांची संख्या अत्यंत कमी आहे. लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढल्याने उद्योजकांसह कामगारांना हातावर हात ठेऊन बसल्या शिवाय पर्याय नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.
शासनाने हातभार लावावा…
करोनामुळे गेली महिनाभर बंद असलेले उद्योग आणखी पुढील 20 दिवस बंद राहणार आहेत. दीड महिना व्यवसायच बंद असल्यामुळे वितरक, पुरवठादार, खरेदीदार आणि उत्पादक सर्वच अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाकडून आता प्रोत्साहनपर योजनांची आवश्यकता व्यक्त होत आहे. कामगारांच्या वेतनासाठीही शासनाने हातभार लावावा, अशी मागणी
होत आहे.
कर्जाचा बोजा वाढतोय
व्यवसाय ठप्प असल्याने कर्जाचा बोजा अनेक व्यवसायिकांवर वाढत चालला आहे. हप्ते बंद असले तरी व्याज आणि चक्रवाढ व्याज सुरूच असल्यामुळे कर्ज फेडण्यात भविष्यात अडचणी येण्याची भीती व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. लॉकडाउन संपल्यानंतर लगेच मागणी वाढण्याची शक्यता नसल्याने तसेच मंदीचे सावट घोंघावण्याची शक्यता असल्याने उद्योजक आणि व्यावसायिक खचून चालले आहेत.
एप्रिलचे वेतन होणार की नाही?
लॉकडाउनमुळे कोणतीच ऑडर नसल्यामुळे घरात बसून काम देणेही कंपन्यांना शक्य नाही. मार्च महिन्याचे वेतन माणुसकीच्या भावनेतून अनेक कंपन्यांनी केले. मात्र एप्रिलचे वेतन कसे करायचे हा प्रश्न अनेक उद्योजकांसमोर आहे. सर्वच आवक-जावक, कॅश फ्लो बंद असल्यामुळे उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या वाढणारे करोनाचे रुग्ण पाहता एप्रिलनंतर लॉकडाउन सुरू राहिल्यास अनेक उद्योगांचे दिवाळे निघण्याची भीती व्यक्त होत आहे.
कामच नसल्याने वेतन तरी देणार कुठून? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. आता सर्व भिस्त शासकीय मदतीवरच असल्याचे सांगण्यात येत आहे. असाच प्रकार इतर बाजारांमध्येही आहे. किराणा, मेडिकल, हॉस्पिटलवगळता सर्वच व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत.