चोवीस तासात 221 नवीन रुग्ण, 22 जणांचा मृत्यू
मुंबई : करोनाचा फैलाव वाढतच चालला असून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 221 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 22 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैंकी मुंबईचे 16, पुणे येथील 3, तर नवी मुंबईचे 2 आणि सोलापूरचा 1 आहे.
राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 वर पोहोचली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 41109 नमुन्यांपैकी 37964 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 217 करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 61,247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5064 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. आज झालेल्या 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये ( 91 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.