रायपूर – छत्तीसगढचे सरकार पाडून आपल्याला त्या राज्याचा एकनाथ शिंदे बनविण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाचे अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता, असा दावा या राज्यातील एका कोळसा व्यापाऱ्याने केला आहे. छत्तीसगढ सरकार पाडण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केली असून त्याकरता छापे टाकले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सूर्यकांत नावाचे हे कोळसा व्यापारी म्हणाले की, 30 जून रोजी आपल्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले की तुम्ही कॉंग्रेसच्या 40-45 आमदारांची यादी तयार करा आणि विरोधी पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करा. तुम्हाला मुख्यमंत्री केले जाईल. मला छत्तीसगढचा एकनाथ शिंदे बनवण्याची त्यांची पूर्ण तयारी होती. सूर्यकांत म्हणाले की, अधिकाऱ्यांनी त्यांना तीन दिवस झोपू दिले नाही. मानसिक आणि शारीरिक छळवणूक केली. आणि आता त्याच प्रकाराला माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याकडून राजकीय रंग दिला जातो आहे.
इन्कम टॅक्स विभागाने 30 तारखेला कोळशाशी संबंधित व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यात 90 कोटी रोख रक्कम आणि साडेचार कोटींचे दागिने जप्त केले असल्याचा दावा केला. तर आपण प्रामाणिकपणाने आणि कष्टाने हे पैसे कमावले असल्याचा सूर्यकांत यांचा दावा आहे. श्रीमंत होण्यात काही गुन्हा तर नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, हे छापे आणि त्यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचे राजकारण तापले आहे. कसा तपास संस्थांचा वापर करून सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी उतावीळ झाली आहे हे या प्रकारावरून स्पष्ट झाले असल्याचे कॉंग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला यांनी म्हटले आहे. तर यात भाजपचा काही संबंध नाही. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीच हे सगळे कारस्थान रचले असल्याचा दावा भाजपने केला आहे.