पुणे – सहायक प्राध्यापक भरती रखडली आहे. ती सुरू करावी यासाठी उमेदवारांनी अनेकदा आंदालने केली. त्यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडून केवळ आश्वासनेच देण्यात आली. त्याबाबत सतत घोषणाच करण्यात आल्या. प्रत्यक्षात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून भरतीला परवानगीच मिळालेली नाही.
राज्यात 4 हजार 74 प्राध्यापकांच्या जागा भरण्यास मागच्या शासनानेच मान्यता दिली होती. त्यातील केवळ 1 हजार 674 पदे भरली असून उर्वरित 3 हजार 64 जागांची भरती अद्याप रखडली आहे. करोनामुळे राज्य शासनाने 4 मे 2020 रोजी आदेश काढून नवीन पद भरतीला बंदी घातली होती. मात्र, त्यानंतर काही विभागांच्या भरतीवरील निर्बंध शिथिल केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता मिळावी, यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर अनेकदा बैठका, चर्चा झाल्या. मात्र, यावर वित्त विभागाने भरतीसाठी कोणतीही अंतिम मान्यता दिली नाही.
दरम्यान, सहायक प्राध्यापकांच्या भरतीमुळे शासनाच्या तिजोरीवर आणखी भार पडणार असल्याने वित्त विभागाकडून अद्याप सहायक प्राध्यापकांच्या भरतीसाठी मान्यताच मिळाली नसल्याची कबुली थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सहायक प्राध्यापक भरती होणारच नाही, असा काही गैरसमज पसरविला जात आहे. मात्र, शासन ही प्राध्यापक भरती नक्कीच सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी पुन्हा केली. यामुळे सहायक प्राध्यापक भरतीकडे “आस’ लावून बसलेल्या उमेदवारांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसण्यात आली आहे.