कर्जत -कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गाच्या भु-संपादनप्रश्नी कुणावरही अन्याय होऊ नये, यासाठी नगर-करमाळा महामार्गाच्या भूसंपादन प्रश्नी आ. रोहित पवार यांनी तालुक्यातील मांदळी, थेरगाव, नागमठाण, घुमरी, कोकणगाव, बेलगाव, मिरजगाव, बाभूळगाव खालसा, नागलवाडी, माही, जळगाव, पाटेगाव, पाटेवाडी, निमगाव डाकू, चापडगाव आदी गावांतील नागरिकांच्या ज्या-त्या भागात नुकत्याच बैठका घेतल्या.
नगर-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्र.(516 अ)या चौपदरी महामार्गाच्या कामाची ई-निविदा निघाली आहे. नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी क्र.516(अ) महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या 38.775 किमी कामासाठी 547.16 कोटी एवढा निधी तर घोगरगाव ते नगर-सोलापुर हद्द या 41.615 किमी अंतरासाठी 641.45 कोटी एवढा निधी या दोन पॅकेजमध्ये राज्य शासनाच्या भारतमाला परीयोजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे.
या मार्गातील भूसंपादनप्रश्नी सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न आ. रोहित पवार यांनी जाणून घेतले. ज्यांची वहिवाट आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा, रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांची यादीत नावे आलेली असतील तर भूमी अभिलेख विभागाने त्याची खात्री करावी व प्रांताधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी, मार्गाच्या हद्दीत येत असलेली झाडे, घरे, पत्र्याचे शेड आदींची मोजणी करून त्याचे मूल्यांकन करणे, कूपनलिकांची पाहणी करून पाणी पुरवठा विभागाने त्याचे मूल्यांकन करणे आदींवर चर्चा करण्यात आली.
भूसंपादनाचा विषय मार्गी लागल्याशिवाय महामार्गाचे प्रत्यक्षरीत्या काम करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनीही सहकार्य करून भु-संपादनाची रक्कम तातडीने घ्यावी, असे आ.पवार यांनी आवाहन केले. आपल्या भूसंपादनाबाबत असलेल्या अडचणी घेऊन शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याऐवजी एकाच छताखाली ही एकत्रित सकारात्मक बैठक घेतली. त्यामुळे लवकरच या कामाचा श्रीगणेशा होणार असल्याचे संकेत आहेत.