सौरव गांगुलीने केले कोहलीच्या संघाचे कौतुक
कोलकाता – जागतिक फुटबॉलमध्ये जे स्थान ब्राझीलचे आहे तेच स्थान जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे आहे, अशा शब्दात बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या संघाचे कौतुक केले आहे.
क्रिकेट या खेळाचे जन्मदाते जरी इंग्लंड असले तरी आजच्या काळात भारतीय संघ जगावर राज्य करताना दिसतो. काही सामन्यांमध्ये किंवा मालिकांमध्ये संघाला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आलेला नसला तरीही संघातील खेळाडूंची गुणवत्ता कुठेही कमी होत नाही. हारणे किंवा जिंकणे हा खेळाचाच एक भाग असतो. मागील कामगिरी अपयशी झाली म्हणजे सर्वकाही संपले असे होत नाही. भारतीय संघाचे नेतृत्व ज्या ज्या खेळाडूंनी केले त्यांनी आपले शंभर टक्के योगदान दिले व संघाच्या विजयासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले. आजच्या घडीला बोलायचे झाले तर फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्वच बाबतीत भारतीय संघ बलाढ्य आहे, असे कौतुकही गांगुलीने केले.
जागतिक फुटबॉल स्तरावर सर्वात बलाढ्य संघ म्हणून ब्राझीलचे नाव घेतले जाते. ते त्यांच्या विजिगिषू वृत्तीमुळेच. आज जागतिक क्रिकेटमध्ये तेच स्थान कोहली आणि कंपनीने मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांची कोणतीही मालिका भारतीय संघ खेळत असेल तर त्यांनाच संभाव्य विजेता समजले जाते हेच या संघाचे यश आहे. क्रिकेट हा खेळ भारतात सर्वात जास्त लोकप्रिय होण्यामागे या खेळासाठी आपले आयुष्य वेचलेल्या अनेक महान खेळाडूंच्या यशाचा वाटा मोठा आहे. जागतिक क्रिकेटला सातत्याने महान खेळाडू देणारा भारतीय संघ जगातील एकमेव संघ आहे. क्रिकेट हा अनेक देशांत खेळ मानला जातो. मात्र, भारतात या खेळाला धर्माचे स्वरुप आले आहे. प्रत्येक व्यक्ती सामना पाहताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखू शकत नाही. भारतीय संघाने प्रत्येक सामना जिंकावा अशीच अपेक्षा चाहत्यांची असते. यातूनच या खेळाला केवळ करमणूक म्हणून नव्हे तर आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणून पाहिले जाते, असेही गांगुली म्हणाला.
महान खेळाडू तयार करणारी खाण..
विजय हजारे, विजय मर्चंट व चंदू बोर्डे यांच्यापासून महान खेळाडूंची परंपरा भारतीय संघाने जगाला दिली आहे. या पिढीनंतर सुनील गावसकर, कपिलदेव ही यादी सुरु झाली. त्यानंतर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांचा काळ गाजला आता विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या रुपाने आज संघात महान खेळाडूंची परंपरा कायम आहे. भारतीय क्रिकेट संघ हा महान खेळाडू तयार करणारी खाणच आहे, असेही गांगुलीने सांगितले.