सिडनी –ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याची गोलंदाजी खेळण्याचे दडपण येत आहे, अशी स्पष्ट कबुली मार्नस लेबुशेन याने दिली आहे. चार कसोटींच्या मालिकेतील पुढील कसोटीत त्याची गोलंदाजी खेळण्याचेच आव्हान संघातील फलंदाजांसमोर राहणार आहे, असेही मत त्याने व्यक्त केले.
आम्ही अश्विनच्या जाळ्यात फसलो. मी याआधी कधीच त्याची गोलंदाजी खेळली नव्हती. तो अत्यंत हुशार गोलंदाज आहे. त्यासाठी कोणत्याही आकडेवारीची गरज नाही. अश्विन या मालिकेसाठी तयारी करून आला आहे. आम्ही त्याच्या जाळ्यात अनेक वेळा अडकतोय. भारताने खुप चांगली गोलंदाजी केली. मग ती फिरकी असो की वेगवान गोलंदाजी, असे लाबुशेन म्हणाला.
भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना त्याने आतापर्यंत अपयशी ठरलेल्या स्टीव्ह स्मिथचा बचाव केला. काही दिवसांपूर्वी त्याने भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याने मर्यादित षटकांचे सामने अधिक खेळले आहेत. कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. क्रिकेट आणि करोना काळातील हे सत्य आहे. स्मिथची कसोटीमधील सरासरी 60 पेक्षा अधिक आहे. त्याला वेगाने धावा करण्यास आवडतात मात्र, सध्या अश्विनसमोर त्याला नेमके हेच जमत नसल्याचे दिसून येत आहे, असे लाबुशेन म्हणाला.
दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने अफलातून क्षेत्ररक्षण लावून धावा रोखल्या. पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघ पूर्ण योजनेने उतरला होता आणि त्याची अमंलबजावणी चोख केली. लेग साइडला धावा करणे अवघड होते. त्याच बरोबर आमचेही क्षेत्ररक्षण अत्यंत सुमार झाले. मेलबर्नच्या सामन्यात आम्ही तब्बल 8 झेल सोडले. त्यामुळेच सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही, असेही त्याने सांगितले.