पिंपरी – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या महामार्गांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे व खासदार श्रीरंग बारणे हे दोन्ही खासदार आग्रही दिसले. नितीन गडकरी यांनीदेखील या दोन्ही खासदारांचे म्हणणे ऐकून गेत, ही कामे लवकरच मार्गी लावू, असे आश्वासित केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व मावळ लोकसभा मतदार संघाचे श्रीरंग बारणेदेखील उपस्थित होते. या दोन्ही खासदारांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील विविध महामार्गांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच ही कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी गडकरी यांना विनंती केली आहे.
अहोरात्र वाहतूक सुरू असलेला तळेगाव – चाकण – शिक्रापूर हा 54 किलोमीटर टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा होऊन जवळपास पाच वर्षांनी अखेर तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा 54 किलोमीटर टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग जाहिर करून पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता हा रस्ता आता भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. यासंदर्भातील हस्तांतरण अधिसुचना भारतीय राजपत्राद्वारे 11 जुलैला प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातून जाणाऱ्या पुणे – नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांनादेखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. चाकणे ते खेडदरम्यान मोठी वाहतूक कोंडी होत असते. या महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड या रस्त्याच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती खासदार कोल्हे यांनी दिली. याशिवाय मावळ मतदार संघातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्याचे काम लवकरच सुरु होईल. त्यामुळे वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळ्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
दोन्ही मतदार संघातून जाणारा महामार्ग
मावळ लोकसभा मतदार संघातून तळेगाव -चाकण शिक्रापूर हा 54 किलोमीटरचा महामार्गा जातो. मावळ तालुक्यातील इंदोरी येथे इंद्रायणीनदी पार केल्यानंतर हा महामार्ग शिरूर लोकसभा मतदार संघात येतो. तर पुणे-नाशिक महामार्गासाठी सध्या रेल्वेमार्गाचा सर्वे सुरू असूनही, महामार्गाच्या रूंदीकरणाबाबत सर्वच नेते आग्रही आहेत.