प्रत्येक माणसाच्या मनात दररोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असंख्य विचार येत असतात. या विचारांचा त्याच्या जीवनाशी खूप खोलवर संबंध असतो. विचार ही एक विलक्षण शक्ती आहे, एक शस्त्र आहे, जे देवाने आपल्याला दिले आहे. याचा वापर करून आपण आयुष्यातील सर्वात मोठी लढाई सुद्धा जिंकू शकतो. विचार ही एक प्रक्रिया आहे. जी निरंतर सुरू असते. मात्र या विचारांवर नियंत्रण आणून आपण नकारात्मक विचारांना कशी बगल देतो हे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात सकारात्मक विचारांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांना यश लवकर दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडीअडचणींचा सामना करावा लागतो. आपला एक विचार आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो.
एक जुनी कथा आहे. एकदा एक कुंभार चिकणमातीपासून काहीतरी बनवत होता. तो आपले काम अतिशय एकाग्रतेने करीत होता.
मातीला हातांच्या तळव्यांनी रगडत होता. ती पूर्णपणे एकरूप होऊन अधिक घट्ट व्हावी म्हणून. तेवढ्यात त्याची बायको तिथे येते आणि त्याला कुतुहलाने विचारते, “”काय हो, एवढं मन लावून काय तयार करीत आहात?” कुंभारही तितक्याच उत्साहाने आपल्या बायकोला म्हणतो, “”अगं, या मातीपासून मी चिलीम बनवतोय. सध्या विविध रंगीबेरंगी चिलीमला बाजारात चांगली मागणी आहे. छान पैसे मिळतील.”
त्याच्या बायकोला ही गोष्ट खटकली. ती त्याला म्हणाली, “”यापेक्षा तुम्ही आकर्षक जग का नाही बनवित? सध्या उन्हाळा असल्याने थंड पाणी पिण्यासाठी मातीच्या जगालादेखील चांगला भाव मिळतोय.”
कुंभाराला बायकोचे बोलणे पटले. आपली बायको समाजाच्या हिताचा विचार करीत असल्याची भावना त्याला सुखावून गेली. कुंभाराने ती माती पुन्हा मळायला सुरुवात केली. चांगली मळून झाल्यानंतर मातीला “जगा’चा आकार द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात त्या मातीतून आवाज आला, “”कुंभार दादा तू हे काय करतोय? काही वेळापूर्वी तर मला वेगळे रूप देत होता आता वेगळे देतोय.”
कुंभार म्हणाला, “”माझी मती बदलली आहे त्यामुळे आता मातीही बदलत आहे. यापूर्वी मी शौकिनांसाठी चिलीम बनविणार होतो. पण आता छान असा पाण्याचा जग तुझ्यापासून बनविणार आहे.”
माती अत्यानंदित होत म्हणाली, “”कुंभार दादा, तुझे विचार बदलले, आणि त्याने माझे जीवनच बदललं. तू चिलीम केली असती तर माझ्यात आग भरली असती आणि मी जळत राहिले असते. आता मी जग झाले. माझ्यात पाणी भरेल, मी स्वतः थंड राहीन आणि लोकांनाही थंडावा देईल.” कुंभार हसला आणि अधिकाधिक मातीच्या जगांना आकार देण्यात मग्न झाला. कुंभाराच्या एका विचाराने मातीचे आणि अनेकांचे आयुष्य सुखावह होणार होते.
नेहमी सकारात्मकतेकडे नेणारे विचार करणे आणि ते आचरणात आणणे ही आपल्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे. यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कारण, जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हाच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता. आपला एक विचार आपली स्वतःची आणि आपल्या सहवासातील लोकांचे आयुष्य बदलू शकतो. म्हणूनच परिस्थिती कशीही असो तुमचा विचार सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. जे लोक सकारात्मक विचारांचा अवलंब करतात ते आनंदी आणि शांत जीवन जगतात.
सकारात्मकतेच्या बळावर सर्व शक्य आहे. कृतीतून यशाला साकार करण्यात सकारात्मक अणि ध्येयवादी विचारांचा मोठा वाटा असतो. नकारात्मक विचारांपासून स्वतःला नेमके दूर कसे ठेवावे? तर सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवा.. यातील पहिली गोष्ट मन रिकामे ठेवू नका कारण रिकाम्या मनात अनावश्यक गोष्टी येत राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी आपल्या ध्येयाविषयी उत्सुकता ठेवा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत राहा.
– सागर ननावरे