परराज्यातील कामगार निघून गेल्याचा किराणा दुकानदारांना फटका
बिबेवाडी – करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरात राहणारे परराज्यातील अनेक छोटे-मोठे कामगार, कारागीर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशांची त्या-त्या परिसरातील किरकोळ किराणा दुकानदारांकडे उधारी खाती आहेत; परंतु हे कामगार आता रातोरात निघून गेल्याने त्यांच्या खात्याची वसुली अडकून पडल्याने असे दुकानदार अडचणीत आले असून अशा उधारी खात्यांची झळ दुकानदारांच्या गल्ल्यांना बसू लागली आहे.
करोनाचा फटका वेगवेगळ्या पद्धतीने अनेक क्षेत्रांना बसत असताना यातून किराणा दुकानदारही सुटलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आल्याने अशा दुकानदारांचा व्यवसाय तेजीत असल्याचे तसेच त्यांनी मोठा आर्थिक नफा कमविल्याची चर्चा अन्य व्यावसायिकांत होती. परंतु, किराणा व्यवसायामागील अनेक दुखणे आता या दुकानदारांना सतावू लागले आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच परराज्यातील अनेक कामगार, कारागीर तातडीने गावी निघून केले आहेत.
बिबेवाडी परिसरात अशांनी संख्या हजारोंमध्ये आहे. या कामगारांचे पगार आठवड्यात तसेच महिन्याला होत असल्याने त्यांची मोठी उधारी खाती येथील छोट्या-मोठ्या दुकानदारांकडे आहेत. यामुळे यातून होणारी उलाढालही मोठी आहे; परंतु असे कामगार, कारागीर गावी गेले असून गेल्या दोन महिन्यांत एक रुपयाही त्यांच्याकडून आलेला नाही. त्यामुळे याची झळ आता किराणा दुकानदारांच्या गल्ल्याला बसू लागली आहे.
पुणे शहरात दि. 8 व 9 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता त्यानंतर 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर होण्याची कुणकुण लागताच परराज्यातील हजारो कामगार, कारागीर गावी निघून गेले आहेत. छोट्या कंपन्या तसेच बांधकाम किंवा अशा छोट्यामोठ्या ठिकाणी हे कामगारा काम करीत असतात त्यामुळे उधारीवरच किराणामाल भरला जातो. असे कामगार मालकाकडून आठवड्याला तर काही जण महिन्याला पैसे देतात. मात्र, किराणा व्यावसायिकांचे पैसे न देताच असे हजारो कामगार गावी निघून गेले आहेत. आता, महिनाभरानंतर अशा उधारी खात्यांत अडकलेल्या पैशांची आकडेवारी मोठी निघू लागली असून त्याची झळ दुकानदारांना बसू लागली आहे.
छोटी-मोठी कामे करणारे हजारो कामगार परिसरात आहेत. अनेक दुकानदारांकडे त्यांची उधारीची खाती आहेत. बहुतांश कामगार परराज्यातील असून ते उधारी न देताच निघून गेल्याने त्याची झळ आता जाणवू लागली आहे. आता, हे कामगार पुन्हा इकडे येतील की नाही, हे सांगणे कठीण असल्याने अशा उधारी खात्यातून दुकानदारांना मोठा फटका बसणार आहे.
– सतीश संचेती, किराणा व्यावसायिक