मुंबई – लहानपणापासून क्रिकेटचे वेड असलेला इरफान खान स्वतः एक चांगला क्रिकेटपटू होता व मोठ्या स्तरावर खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, एका स्पर्धेत खेळण्यापूर्वी त्याला शुल्क म्हणून सहाशे रुपये भरावे लागणार होते. त्या पैशांचा बंदोबस्त न झाल्याने त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याची इच्छाही त्याने सोडून दिली.
राजस्थानच्या जयपूर या गुलाबी शहरात जन्मलेला इरफान लहानपणापासूनच क्रिकेटवेडा होता. तेथील जवळच असलेल्या मैदानावर तो क्रिकेट खेळत असे. तिथेच त्याला एका मोठ्या परंतु स्थानिक स्पर्धेत खेळण्याची संधीही मिळाली होती. मात्र, त्यासाठी त्याला फक्त सहाशे रुपयांची गरज असतानाही त्याला वेळेवर पैसे मिळाले नाहीत आणि म्हणूनच त्याने या खेळात आपली कारकीर्द होऊ शकत नाही असा विचार करुन अभिनय क्षेत्रात शिरकाव केला.
भारतातील स्थानिक क्रिकेटमध्ये नावाजल्या जात असलेल्या कर्नल सि. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी हुकल्याने पुढील अनेक दिवस तो निराश होता. खरेतर त्याच्या घरची परिस्थिती देखील त्याला सहाशे रुपये मिळतील अशी नव्हती. मित्र, नातेवाइक यांच्याकडूनही त्याची निराशाच झाली व एक चांगला क्रिकेटपटू खेळापासून दूर गेला. घरात पोट भरण्यासाठी देखील रोज प्रश्न निर्माण होत होता त्यामुळे आपल्याला क्रिकेट खेळणे शक्य होणार नाही व त्यात कारकीर्दही घडविता येणार नाही हे त्याने स्वतःशी मान्य केले.
त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला व अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. छोट्या पण लक्षात राहतील अशा भूमिका त्याने केल्या व एक दिवस त्याच्या गुणवत्तेची दखल संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीला घ्यावी लागली. एकीकडे अभिनय क्षेत्रात मोठा होत असतानाही केवळ छंद म्हणून तो मित्रांना जमवून काही वेळा क्रिकेटही खेळायचा. त्याच्या अभिनयातील कर्तृत्वामुळे त्याची ओळख वाढली व क्रिकेटपटूंशीही त्याची मैत्री झाली.