नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राहुल गांधी यांच्यावर देशभरातून टीका केला जात आहे. मात्र भाजपचे खासदार संजय जैस्वाल यांनी राहुल गांधी यांच्यावर व्यक्तिगतरित्या जहरी टीका केली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जैस्वाल यांनी विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नसल्याचे म्हटले आहे.
यावेळी संजय जैस्वाल म्हणाले की, “जी व्यक्ती देशातील लोकशाही, न्यायालये आणि पत्रकारांना चुकीचे मानते, अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही. खरं विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही. हेच 2 हजार वर्षांपूर्वी चाणक्यांनी सांगितले होते. राहुल गांधींना बघितल्यानंतर त्यांच्या शब्दांची आठवण येते.”
मोदी आडनावाप्रकरणी केलेल्या विधानाबाबत जैस्वाल यांनी राहुल गांधींवर ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोपही केला. याप्रकरणी त्यांना या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचेही म्हटले. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर अशी वैयक्तिक टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देखील राहुल गांधीबाबत अशा पध्दतीचे विधान केले होते. “राहुल यांनी देशात राजकारण करू नये. त्यांना भारताबाहेर हाकलून द्यावे. राहुल गांधी हे भारताचे नाहीत हे त्यांना मान्य आहे. आम्हालाही माहित आहे की ते भारतातील नाही. चाणक्य म्हणाले होते की, परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला व्यक्ती कधीही देशभक्त होऊ शकत नाही आणि राहुल गांधींनी ते सिद्ध केले आहे.”