नवी दिल्ली – काही लोकांना आपल्याला सत्ता कशी मिळेल याचीच दिवस रात्र चिंता लागून राहिलेली असते. मी स्वत: सत्तेच्याच परिघात जन्माला आलो पण मला कधीही सत्तापिपासू राहिलो नाही, मला सत्तेत तितके स्वारस्यही नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
आज येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आपल्याला आंबेडकरांनी घटना दिली, पण त्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचेच अस्तित्व नष्ट झाले तर या घटनेलाही काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे देशाच्या संस्था वाचवल्या पाहिजेत. संस्था वाचल्या तर घटनेला अर्थ आहे असे ते म्हणाले.
पेगॅसस, सीबीआय, ईडी अशी माध्यमातून सध्या आकम्रण सुरू आहे. देशाच्या सर्व महत्वाच्या संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आक्रमण झाले आहे. त्यातून घटना कमकुवत झाली आहे. त्याचा मोठा फटका आज देशातील गरीब वर्गाला बसतो आहे असे ते म्हणाले.आंबेडकरांनी आपल्याला घटनचे शस्त्र दिले पण आज त्या शस्त्राचा काहीही उपयोग उरलेला नाही असे ते म्हणाले.
पेगॅसससह विविध यंत्रणांची भीती राजकीय नेत्यांना घातली जात आहे. त्यातून अनेक मोठे नेते घाबरून गेले आहेत. असे नमूद करताना राहुल गांधी यांनी आज मायावर्तींचे उदाहरण दिले. ते म्हणाले की,उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीत आम्ही त्यांना आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असेही मायावतींना आम्ही सांगितले होते. पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. मायावती इतक्या गप्प होण्याचे कारण सीबीआय आहे असेही त्यांनी नमूद केले.
….तर आज मी येथे भाषण देऊ शकलो नसतो
विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पेगॅसस, सीबीआय, ईडीचा वापर करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे नमूद करताना राहुल गांधी यांनी आपल्याला या यंत्रणांची अजिबातच भीती नसल्याचे नमूद केले. ते म्हणाले की मी जर एक रूपयाहीं कोठे खाल्ला असता तर आज मी तुमच्यासमोर भाषणच देऊ शकलो नसतो. त्याऐवजी मी कोठे तरी एका कोपऱ्यात तोंड लपवून बसलो असतो असे राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले.