रांजणगाव गणपती : पावसाची प्रतीक्षा पाहणारा शेतकरी अवकाळी अतिवृष्टीने मेटाकुटीला आला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अर्थिक गणित बिघडले आहे. ऐन दिवाळीत दिवाळ निघाल्याने सण साजरा कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
करोना महामारीत कसातरी टिकून राहिलेला शेतकरी पुन्हा उभारी घेत घेण्यासाठी दोन पैसे खिशात पडतील या अपेक्षेने शेतकरी जीवाचे रान करून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे मिळतील या अपेक्षेने कष्ट करीत होता. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे वास्तव जीवन व स्वप्नवत जीवन भंग पावले आहे. अवघ्या जगाचा पोशिंदा, शेतकरी राजा आज शेतात हजारो, लाखो रुपयांची गुंतवणूक करुन अतिवृष्टीमुळे अडचणीत आला आला.
उधारी व ऊसनवारीवर तसेच पिकाचे पैसे आल्यावर उधारी देऊ, या अपेक्षेने व्यवहार केला आहे. खते व बी बियाणे यांचे पैसे कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे. घरातील मुलांची शिक्षणे, दवाखाना, घरातील खर्चाच्या ताळमेळाने शेतकरी चक्रावला आहे. अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले आहे.
शेतकरी केवळ शेतीच्या जीवावर जगत असलेले वास्तविक जीवन व कष्टाच्या जोरावर पाहिलेली स्वप्ने भंग पावली आहेत. यावर्षी शेतकरी बांधवाच्या कुटुंबात उच्च शिक्षण घेत असलेले युवक व युवती असेल किंवा एखादे विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी असेल तर आता हे सर्व करायचे कसे, याची चिंता शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. महसूलकडून अद्याप नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत. पीक विमा योजनेचा लाभ व्यवस्थित मिळत नाही.