रावणगाव- राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार योजनेतील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा आदेश काढला आहे. सध्या सर्वत्र दि. 14 पर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे या आदेशामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. शहरी भागातील शाळा दि. 14 मार्च रोजी व इतर सर्व भागातील सर्व शाळा दि. 16 मार्च पासून 31 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संपूर्ण देशात करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले.
या काळात संचारबंदी असल्याने कोणालाही घराबाहेर पडू दिले जात नाही. परंतु याच काळात शिक्षक, विद्यार्थी, पालकांना धान्य वितरणासाठी घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे संचारबंदी आदेशाचा भंग होणार आहे. अनेक विद्यार्थी, शिक्षक व पालक शाळेत एकत्र आल्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळांमध्ये पोषण आहार योजना राबवण्यात येत आहे. मात्र, आता करोनामुळे शाळांना दि. 14 पर्यंत सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत, म्हणून शाळेतील शिल्लक धान्य विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश उपसचिव राजेंद्र पवार यांनी शिक्षण संचालकांना दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सुटीच्या काळातदेखील पोषण आहार मिळणार आहे.
मात्र, या आदेशात काही बाबींमध्ये स्पष्टता नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच राज्यातील सर्व शाळांना 16 मार्चपासून सुटी जाहीर झाल्यामुळे अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या मूळगावी गेले आहेत.
अनेक शिक्षक वेगवेगळया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर झाली.जिथे असाल तिथेच रहा, असे प्रशासनाचे आदेश असल्याने सर्वजण (अनेक मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कर्मचारी) त्यांच्या मूळगावी अडकले आहेत.
त्यामुळे शिल्लक राहिलेले धान्य, डाळी, कडधान्य वाटप करायचे तर मूळगावाहून शाळा असलेल्या नोकरीच्या गावी कसे जायचे, असा प्रश्न सर्व शिक्षकांना सतावत आहे. सर्व बसेस, रेल्वसेवा बंद आहेत.
त्यामुळे एवढ्या लांब जायचे कसे? ज्यांच्याकडे दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. परंतु पेट्रोल, डिझेल मिळण्यात अडचण येत आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश आहेत.
त्यामुळे जायचे कसे? गेले तर पोलीस मारतील का? विचारपूस केली तर प्रवास करण्यासाठी परवाना नाही, अनेक शिक्षकांना ओळखपत्र नाही, अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या गावांच्या सीमा, रस्ते अडवून बंद केल्या आहेत, आदी अडचणींचा डोंगर शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे.
लॉकडाऊननंतर धान्य वितरणचे आदेश द्या
अनेक विद्यार्थी शेजारच्या गावातून, विविध वस्त्यांवरून शाळेत येतात. तेथेही अनेक ठिकाणी गावामध्ये बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश बंदी, रस्ते बंद आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांना देखील शाळेत पोषण आहार आणण्यासाठी अडचणी येत आहेत.
त्यामुळे अनेक शिक्षकांनी तसेच विविध शिक्षक संघटनांनी लॉकडाऊन रद्द झाल्यानंतर व संचारबंदी संपल्यानंतर शिल्लक धान्य वितरण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. यामुळे हे काम करण्यासाठी सरकारने जोड आदेश काढून अधिक स्पष्टता आणावी; तसेच, हे वाटप नेमके कसे करावे, याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणीही शिक्षकांमधून होत आहे.