शिक्रापूर -शिरूर तालुक्यामध्ये बाजरीच्या बोगस बियाणांच्या तक्रारीपाठोपाठ आता उत्पादनास व विक्रीस बंदी असलेले खत शेतकऱ्यांच्या माथी मारून विक्रेते उखळ पांढरे करून घेत आहेत. वढू बुद्रुक येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकत 72 हजार 800 रुपये किमतीच्या 82 खतांच्या गोण्या जप्त केले आहेत. याप्रकरणी खत विक्रेत्यांसह कंपनी संचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वढू बुद्रुक येथील न्यू शंभूराजे केंद्राचे संचालक सोमनाथ रोहिदास शिंदे (रा. वढू बुद्रुक), खताची निर्मिती करणाऱ्या सत्यम ऍग्रो इंडस्ट्रीज (नाशिक) कंपनीचे संचाल यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कृषी उपविभागाचे खते निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविशंकर सिद्धेश्वर कावळे (रा. सुसगाव, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
वढू बुद्रुक येथील कृषी सेवा केंद्र संचालकांकडून बंदी असलेल्या नॅचरल पोटॅश खताची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाचे खते निरीक्षक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविशंकर कावळे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती देत कावळे, गुणवत्ता निरीक्षक संदीप तांबे यांनी वढू बुद्रुक येथील न्यू शंभूराजे कृषी केंद्रात बोगस शेतकरी ग्राहक पाठवून उसासाठी खताची मागणी केली.
कृषी सेवा केंद्राचे शिंदे यांनी बंदी असलेल्या नॅचरल पोटॅश खताच्या गोणी, युरिया व इतर खते दिली. त्यांनतर अधिकाऱ्यांनी केंद्राची तपासणी केली. त्यांना नॅचरल पोटॅश खताच्या दोन गोण्या आढळल्या.
गोडाऊनमध्ये पाहणी केली असता 80 गोणी मिळून आल्या. अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याकडे खतांच्या बिलाची मागणी केली असता शिंदे यांनी कंपनीने आम्हाला कोणत्याही प्रकारचे बिल दिले नसल्याबाबत सांगितले.
यावेळी गोण्यांवर सत्यम ऍग्रो इंडस्ट्रीज, 18 चिंतामणी अपार्टमेंट भाविकनगर गंगापूररोड नाशिक असा पत्ता आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या खतांच्या गोण्यांचा पंचनामा करून विक्रीस बंदी करण्याचे आदेश बजावले. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण भालेकर करीत आहेत.
गोलमाल केंद्रांवर कारवाई होणार?
शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी बनावट बियाणे शेतकऱ्यांना विक्री होत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे कृषी केंद्र चालकांची चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे. कृषी विभागाने धडक कारवाई करीत झारीतील शुक्राचार्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यात गोलमाल करणाऱ्या इतर कृषी केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. तरच शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे, असा सूर शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उमटत आहे.