भोसरी – भोसरी येथील आळंदीकडे जाणारा मार्ग आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहने पार्क केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त कोण लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भोसरीतील बीआरटी बसस्थानकाजवळ असलेल्या मजूर अड्ड्यावर सकाळी कामगारांची असलेली गर्दी तसेच स्थानिक रिक्षाचालक व दुचाकी धारक थेट रस्त्यावर ठिय्या देऊन असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक संथ झाल्याने कोंडी होत आहे.
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या लगत असलेला बीआरटी व एसटी बस थांब्यामुळे येथे चाकण, राजगुरूनगर यांसह नाशिककडे जाणार्या बसेस उभ्या राहतात. या बसकरिता मार्गावरील वाहतूक सुरळीत राहवी याकरिता रस्त्याच्या डाव्या बाजूला नियोजन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या रिक्षाचालकांच्या गोंधळामुळे रिक्षा थेट रस्त्यावर उभ्या करून प्रवासी भरण्यासाठी तासन्तास उभ्या असतात. सकाळी चाकरमान्यांची कामावर असलेली लगबग यामुळे या परिसरात नागरिक, व वाहनांची एकच गर्दी होते. त्यामुळे पादचार्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहतुकीस अडथळा ठरणार्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण करणार्या पोलीस कर्मचार्यांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भोसरी चौकात वाहतुकीच्या नियमांना तिलाजंली
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली असलेल्या चौकात वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने लहान मोठे अपघात व वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. परंतु वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याने बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे. आळंदीकडून येणार्या दुचाकी साठी चाकणकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून वळण घेऊन जाण्याचा सुरक्षित मार्ग आहे. मात्र दुचाकीचालक शॉर्टकटचा वापर करत असल्याने अपघातास निमंत्रण देत आहेत.
नो-पार्किंगमध्येच पार्किंग
महापालिकेने पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर चांदणी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौकापर्यंत नो-पार्किंगचे फलक लावले आहेत. तरीदेखील बेशिस्तपणाने या फलकांखाली वाहने लावली जात आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावर नो पार्किंगची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. यापूर्वी आळंदी रस्त्यावर सम विषम पार्किंगचे नियोजन केले होते. मात्र, या नियोजनाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.