केंदूर -कोरेगाव-धानोरे शाखेला पाणी सोडण्यासाठी आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा केल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर या शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्ह्यातील भाजपचे नेते सरसावले आहेत.
भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह खासदार गिरीश बापट, माजी आमदार बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, तसेच धर्मेंद्र खंडरे, अविनाश बवरे, सुदर्शन चौधरी यांनी याबाबत जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन निवेदन देऊन शेतकऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत निषेध व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यापासून कोरेगाव-धानोरे चारीला पाणी सोडण्यासाठी शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी लेखी आणि तोंडी पाठपुरावा करत होते मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना पुढचा दिवस दाखवत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी चक्री उपोषणही केले होते, तर पाणी देऊ असे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागने दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले होते; पण पाटबंधारेने आश्वासन मोडीत पाणी देणार नाही, असे सांगितल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी (दि. 10) कोरेगाव-धानोरे चारीचे दरवाजे उघडून पाणी सुरू करून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना एकप्रकारे धक्काच दिला होता.
त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत अधिकाऱ्यांच्या मदतीने पाणी बंद केले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी समंजसपणा दाखवून अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले. यावेळी कालव्याच्या दुतर्फा सुरू असलेले कृषी पंप बंद करून वाढलेले पाणी संबंधित चारीला सोडण्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले होते; मात्र पुन्हा नियमितपणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले.
दरम्यान दोन-दोन शेतकाऱ्यांनी पत्र देऊन देखील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी 20 महिलांसह 65 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले, त्याच्या निषेधार्थ जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी राम यांना निवेदन देऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.