मुंबई – आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमिवर भिवंडी येथील महाविजय कार्यशाळेत भाजपकडून “मोठं कुटुंब, सुखी कुटुंब’चा नारा देण्यात आला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी ही घोषणा करताना, स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटासोबत जुळवून घेण्याचे आवाहनही यावेळी केले आहे.
शेलार यांनी यावेळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीकेचे प्रहार केले. सोनिया गांधी यांना मुलाची, तर शरद पवारांना मुलीची काळजी आहे. आता आपल्या सोबत खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याचे शेलार यांनी सांगितले. दरम्यान या कार्यशाळेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपाच्या योजनेबद्दल बोलताना म्हटले की, 1 लाख बूथवर आपण समिती करत आहोत. एका लोकसभा मतदारसंघासाठी 500 सोशल मीडिया वॉरीयर आपण करत आहोत. 16 जुलै रोजी पुन्हा 100 टिफिन बैठका घ्या, 288 टिफिन बैठकांचे रिल्स तयार करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली आहे. त्याशिवाय, भाजपच्या पाठिंब्यासाठी 60 हजार मिस कॉल गेले पाहिजे. यानंतर सर्व कॉलिंग सरळ ऍपच्या माध्यमातून होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राज्यातून 45 खासदार
मोदी 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा राज्यातले 45 खासदार शपथ घेतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. गेल्या 32 वर्षांत देवेंद्र व माझ्यात एकमत राहिले आहेत. आम्ही तुम्हाला 90 टक्के स्ट्राईक रेट देऊ. पण ज्याप्रकारे तयारी सुरु केली आहे, नेते कुठेही मनाचे खच्चीकरण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहनही बावनकुळे यांनी केले. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनाही ती मदत कामाला येईल, असेही त्यांनी म्हटले.
ठाकरेंकडून जनादेशाची हत्या-फडणवीस
उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये जनादेशाची हत्या केली आहे. रात्रंदिवस युतीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडण्याचे काम केले. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपच्या पाठीत खंजिर खुपसला. मात्र, असा अन्याय ज्या-ज्या वेळी होईल, त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गुरुवारी केला. फडणवीस पुढे म्हणाले, 2019 साली भाजप-सेनेचे पूर्ण बहुमत आले होते. पण त्यावेळी काही लोकांनी त्यात खडा टाकला. आता उद्धव ठाकरे पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेत आहेत. तेव्हा त्यांनी देखील देवीपुढे मनातल्या मनात माफी मागितली असेल. कारण ते आता हतबल झाले आहेत.
भाजपात नाराजी उफाळून येणार- खडसे
सरकारमधील अजित पवारांच्या समावेशामुळे सत्ताधारी पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे. भाजपच्याही आमदारांमध्ये नाराजी आहे. मात्र, ते त्यांच्यातील नाराजी बाहेर बोलत नाहीत. अनेक आमदार माझ्याशी बोलताना नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आज ना उद्या ही नाराजी उफाळून येणार आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसेच, कर्नाटकचे विजयामुळे उलट कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये उत्साह आहे. काही महिन्यांसाठी कॉंग्रेसमधून कोणी तिकडे जाईल असे मला वाटत नाही. पक्ष फोडणे हेच प्रथम कर्तव्य देवेंद्र फडणवीस यांचे दिसत आहे. स्वतःच्या पक्षावर लक्ष देण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी अधिक लक्ष दिल्याचेही ते यावेळी म्हणाले.