चंडीगढ – केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने कृषी क्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. त्याची किंमत भाजपला पुढील सर्व निवडणुकांत चुकवावी लागेल, असा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अमरिंदर सिंग यांनी सोमवारी दिला.
भाजपची सत्ता असणाऱ्या हरियाणात नुकताच शेतकऱ्यांवर लाठीमार झाला. त्याचे समर्थन त्या राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले. एवढेच नव्हे तर, हरियाणातील शेतकऱ्यांना पंजाब सरकार चिथावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्यावरून अमरिंदर यांनी खट्टर यांच्यावर पलटवार केला. लाठीमाराचे समर्थन करणाऱ्या खट्टर यांचा शेतकरीविरोधी अजेंडा उघड झाला आहे. शेतकरी जगण्यासाठी आणि उपजीविकेसाठी लढा देत आहेत. त्यांना इतर कुणाच्या चिथावणीची गरज नाही. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करण्याआधी शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये दोन महिने निदर्शने केली.
मात्र, त्यावेळी आमच्या राज्यात हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. इतरांवर खापर फोडण्याऐवजी कृषी कायदे मागे घेतले जावेत. भाजपने शेतकऱ्यांना वाटणाऱ्या चिंतेचा विचार केला असता तर गंभीर पेच निर्माण झाला नसता, अशी भूमिका अमरिंदर यांनी मांडली.