नवी दिल्ली – 1993 साली राजधानी एक्सप्रेस आणि अन्य रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या व्यक्तींविरोधात अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हमीर उई उद्दीन याच्यावर अद्याप आरोपपत्र का ठेवण्यात आले नाही, या प्रकरणाची सुनावणी वेगाने होण्याची गरज अधोरेखित करत राजस्थानातील अजमेरमधील विशेष न्यायालयाकडे अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागितला आहे. हा अहवाल दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये सादर करावा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
आरोपी हमीर उई उद्दीन याला 2010 पासून अटक करण्यात आली असून तो तेंव्हापासून कोठडीमध्येच आहे. मात्र त्याच्यावर आरोपपत्र ठेवले गेलेले नाही आणि त्याच्याविरोधातील खटलाही सुरू झालेला नाही. या प्रकरणाचा कोणताही निष्कर्श लगेच निघणे शक्य नसल्याने आरोपीला विशेष टाडा न्यायालयाकडून त्वरित जामीन मंजूर व्हायला पाहिजे होता, असे याचिकाकर्त्याच्यावतीने न्यायालयात सांगितले.
मात्र आरोपी जवळपास 15 वर्षे फरार होता, असे सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयात सांगितले गेले. मात्र त्याला बेमुदत कोठडीत ठेवता येऊ शकणार नाही. एकतर आरोपीला दोषी ठरवा अथवा त्याची निर्दोष मुक्तता करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.