बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दलाने भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिहारमध्ये जेडीयू व भाजप युतीचे सरकार यामुळे कोलमडले. या राजकीय भूकंपानंतर नितीश कुमार राजदला सोबत घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये जनता दल, महाराष्ट्रात शिवसेना असे भाजपचे जुने सहकारी पक्ष सोडून गेल्याचे पाहायला मिळत असतानाच आता आणखी एक मित्रपक्ष याच वाटेवर असल्याची चिन्हं आहेत. २०१४ विधानसभा निवडणुकांमध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारमध्ये रसपला सत्तेचे वाटेकरी देखील करण्यात आले. मात्र गेल्या काही काळात भाजप – रासपमध्ये दरी पडल्याचं पाहायला मिळतंय.
भाजप – रासपतील वाढत्या दरीची प्रचिती आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून आली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील निवडणुकांपासून विधानसभा, लोकसभा निवडणुका पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केल्याचे समजते. यावर रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. ( BJP to lose one more alliance partner in maharashtra )
जानकर ठाकरेंसोबत जाणार?
राज्यात सत्ताबदल झाला असून महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजप – शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले आहे. शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेनेत सध्या दोन गट पडल्याचं दिसतंय. एक गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे तर एका गटाने एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे.
अशातच काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या महादेव जानकर यांना बऱ्याच काळापासून भाजपसोबत दरी निर्माण झाल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरेंसोबत जाणार का? असे विचारण्यात आले होते, यावर प्रतिक्रिया देताना जानकर यांनी, “राजकारणात जर-तरला किंमत नाही. मी सध्या एनडीएसोबत आहे. त्यामुळे या बोलण्याला अर्थ नाही” असं म्हणत महादेव जानकर यांनी या चर्चेवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जानकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “असं काही नाही. माझ्यापेक्षा शरद पवार आणि भाजपचे संबंध चांगंले आहेत”, असं विधान केलं.
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपदाची मागणी
दरम्यान, महादेव जानकर यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, भाजपने मित्र पक्षांना सत्तेत वाटा दिला पाहिजे. आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक महामंडळ दिलं पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता रासप कार्यकर्त्यांनी स्वबळाची मागणी केली असली तरी पक्ष नेतृत्व याबाबत काय निर्णय घेत हे पाहावं लागणार आहे. ( BJP to lose one more alliance partner in maharashtra )