मुंबई : कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजारा होत आहे. आज घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यादरम्यान फडणवीसांचे कुटुंबिय उपस्थित होते.
यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व गणेशभक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. देशासमोरचे आणि राज्यासमोरचे सर्व विघ्न दूर होऊ दे, अशी मी विघ्नहर्ताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांना सुख, समाधान, ऐश्वर्य मिळावे. व स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देश व राज्य प्रगतीपथावर जावे, असे साकडे फडणवीसांनी गणरायाला घातले आहे.