इस्लामपूर – तत्त्वे किंवा विचारांची बांधिलकी जपण्यापेक्षा खोगीरभरती करणाऱ्या भाजपला महाराष्ट्राने नाकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व काश्मीरमधील 370 कलमाचा फॅक्टर राज्यात चालला नाही. त्यामुळे भाजपने येनकेन प्रकारेण सत्ता स्थापन करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिला.
आ. पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात आघाडीच्या पाच जागा विजयी झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने युतीता नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात 160 जागा मिळवू, अशी वल्गना करणारे 100 च्या आसपास घुटमळायला लागले आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात जे राजकारण केलं, दिसेल त्याला पक्षात घेऊन कुरघोडी केली, त्यांची राज्यात पाच वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता होती तरीही त्यांचे आमदार 123 पेक्षा कमी निवडून येतात. याचा अर्थ त्यांना मतदारांनी नाकारले आहे. आमच्यातील पंधराएक माणसं तिकडं गेली. ती गेली नसती तर भाजपचा आकडा 70 किंवा 75 वर आला असता.
ईव्हीएमबद्दल शंका असल्याने लोकांनी प्रचंड काळजी घेतली. निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा उद्योग बंद करावा. पुन्हा बॅलट पेपरवर यावे. जगात बॅलट पेपर आहे. लोकांच्या मनात जे आहे, तेच लोकशाहीत असले पाहिजे. लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आगामी निवडणुका बॅलट पेपरवर घ्याव्यात. हरियाणातदेखील भाजपला जनतेने पूर्ण बहुमत दिले नाही. भाजपची कूटनीती आता चालणार नाही. ज्यासाठी लोकांनी निवडून दिले, ते विषय न घेता भलतेच विषय निवडणुकीत आणले. महाराष्ट्राने त्यांचा प्रयोग अयशस्वी ठरवला आहे.