मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेसाठी चांगलाच गोंधळ उडाला आहे. आज मुंबईत भाजपच्या महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत आमदारांची बैठक विधानभवनामध्ये पार पडली. दरम्यान, भाजप मुख्यमंत्रीपद, गृह, नगरविकास, अर्थ, महसूल सोडून इतर खात्यांवर शिवसेनेशी चर्चा करण्यास तयार आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
उध्दव ठाकरे यांच्या हातात महाराष्ट्रातील सत्तेचा रिमोट कंट्रोल, ताकद वाढली असल्याचे चित्र आहे. दरम्यान शिवसेना आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे वचन स्व. बाळासाहेबांना दिले होते, असे उध्दव ठाकरे निवडणूक प्रचारात अनेकदा म्हणाले होते. उपमुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरे यांना दिले जाणार असे बोलले जात होते. मात्र निकालानंतर नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नव्या सरकारमध्ये आदित्य यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा आग्रह धरण्यात आला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहे. मात्र मुख्यमंत्रीपद देण्यास कोणत्याही स्थितीत तयार नाही.